
फलटण : छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, प्रभू श्रीरामाची भूमी, महानुभाव पंथीयांची आणि जैन धर्मियांची दक्षिण काशी अशा सर्वार्थाने ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या या शहरात आणि तालुक्यात सलग ३०/३४ वर्ष सत्तेत राहुन आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या शहर तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. शांत, अभ्यासू, विकासाचे ध्येय ठेवून लोकांना न्याय देणाऱ्या या लोकप्रतिनिधी विरुद्ध बोलण्याची हिम्मत करणाऱ्यांनी आम्ही काय केले त्याचे श्रेय घेण्यापेक्षा तुम्ही काय केले ते सांगावे आणि मते मागावीत. फलटणच्या विकासाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वीकारले आहे त्यामुळे कोणाच्या भुलथापांना फसू नका व या निवडणुकीत ॲड. अनिकेत राजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सांगता सभेत मार्गदर्शन करताना ना. गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. रामराजे नाईक निंबाळकर, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, गृह, महसूल, अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम, आ. निलेश राणे, माजी आमदार दिपकराव चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शारदाताई जाधव, शिवसेना संपर्कप्रमुख शरदराव कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर व शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस व कृष्णा भीमा विकास आघाडीचे सर्व उमेदवारांची उपस्थिती होती.
फलटण नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सांगता सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी, गर्दीने फुलून गेलेले सभास्थान आणि त्यांचा उत्साह पाहिल्यानंतर माझा थकवा निघून गेला आहे. लोकांच्या या उत्साहाने नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार ॲड. अनिकेतराजे आणि त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची आपली खात्री झाली असल्याचे स्पष्ट करून मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आ. रामराजे यांनी या शहर तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहेच, त्यापेक्षा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वाट्याचे पाणी मुदतीत अडविण्यासाठी आर्थिक तरतुदी नसताना रोखे काढून धरणे बांधली, कालव्यांची कामे काही ठिकाणी अपुरी राहिली तरीही पाणी शिवारात पोहोचविले आहे. अशा शांत, अभ्यासू, विकासाचे ध्येय ठेवून लोकांना न्याय देणाऱ्या या लोकप्रतिनिधी विरुद्ध बोलण्याची हिम्मत करणाऱ्यांनी आम्ही काय केले त्याचे श्रेय घेण्यापेक्षा तुम्ही काय केले ते सांगावे आणि मते मागावी असेही विरोधकांना यावेळी खडसावले. आ. रामराजे यांनी धरणे बांधली नसती, पाणी आडविले नसते तर आज फुललेले शिवार दिसले नसते. याचा विचार न करता या पाण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे चुकीचा असल्याचे सांगत अशा प्रकारच्या फसव्या प्रचारांना भुलून चुकीच्या उमेदवारांना मतदान कराल तर ५ वर्षे पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची माहिती, ते सोडविण्याची क्षमता आणि त्यासाठी वेळ देण्याची तयारी असलेल्या ॲड. अनिकेतराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा आणि फलटणच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवा. नगरपालिकेच्या विविध विकास योजनांसाठी निधीची तरतूद करण्याची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन तुमच्या समक्ष स्वीकारली आहे. त्यामुळे आता निधीची चिंता करु नका, कोणाच्या भुलथापांना फसू नका. या निवडणुकीत ॲड. अनिकेतराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक त्या नागरी सुविधा आपणास निश्चितपणे उपलब्ध होतील अशी ग्वाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट शब्दात दिली.

सर्वसामान्य फलटणकरांच्या मनातील ॲड. अनिकेतराजे यांचे पॅनल निवडून दिले तरच फलटणचा कायापालट अधिक मजबुतीने करता येणार आहे, याची खात्री झाल्याने किंबहुना त्या विश्वासापोटी फलटण शहर आपल्या पाठीशी असल्याचे सभेतील उपस्थिती वरुन स्पष्ट झाले आहे. आपण केवळ सभेतील गर्दी पाहिली नाही तर या गर्दीवरून नजर फिरविल्यानंतर आपल्या लक्षात आले की, ही सारी मंडळी फलटण शहरातील आहेत, यामध्ये ग्रामीण भागातील एकही चेहरा आपल्या निदर्शनास आला नाही. वास्तविक निवडणूक प्रचार सांगता सभेस त्यांची उपस्थिती आवश्यक आहे जे उद्याच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत, जे मतदान करणार नाहीत त्यांच्या गर्दीने केवळ समाधान होईल मात्र मतदान मिळणार नाही. या सभेत केवळ शहरातील मतदार असल्याने अनिकेतराजे तुमचा विजय निश्चित झाला आहे अशा शब्दात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी फलटण नगर परिषदेच्या निकालाचे भाकीत सर्वांसमोर ठेवले. नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे आणि पालकमंत्री म्हणून आपण स्वतः खंबीरपणाने तुमच्या पाठीशी आहे जिल्हा विकास निधी आणि नगरोत्थान मधून उपलब्ध होणारा निधी देण्याची जबाबदारी आपल्याकडे असल्याने त्याबाबत निश्चित रहा तसेच नगर विकास खात्याच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही नामदार एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन आपल्याला दिली असल्याने तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही किंबहुना येथे निधीचा पाऊस पाडू अशी ग्वाही पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी यावेळी दिली.
गृहराज्यमंत्री आणि शिवसेना एकत्र येतात त्यावेळी त्यांच्याशी पंगा घेणे महागात पडेल असा इशारा देत, निवडणूक कायद्याने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आमचा उमेदवार अथवा कार्यकर्ता कायदा मोडणार नाही याची ग्वाही देतानाच समोरच्यांनी कायदा मोडला तर पोलिसांनी खबरदारी घ्यावी अन्यथा आपण स्वतः गृहराज्यमंत्री पद बाजूला ठेवून शिवसैनिक म्हणून येथे येऊ असा इशारा ना. योगेश कदम यांनी यावेळी बोलताना दिला.
गेली ४० वर्ष या शहर तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली विकासाचे डोंगर उभे केले त्यांना कोणी बोलणार असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी आपण खंबीर आहोत, मात्र निवडणूक शांततेत पार पाडा कारण आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे गेल्या काही दिवसातील प्रचार सभा विशेषता आजच्या सभेतून ते स्पष्ट झाले आहे विजयानंतर जल्लोष करा त्यावेळी आम्हाला पाचारण करा त्या जल्लोषाच्या सभेत आपण निश्चितपणे विरोध करणाऱ्यांना चोख उत्तर देऊ असे प्रतिपादन मंत्री योगेश कदम यांनी यावेळी केले.

शहराच्या विकासासाठी वळण आणि निधी केवळ शिवसेनाच देऊ शकते. दमदाटीची भाषा आमच्या समोर चालत नाही. मतदारांनी नगर परिषदेची सत्ता कोणाच्या ताब्यात देणार याचा निर्णय घेताना या शहराचा सर्वांगीण विकास कोण करू शकतो याचा विचार करावा. आजचे दमदाटी करणारे उद्या येथील सत्तेत बसले तर तुमचे प्रश्न ऐकून घेतील का, तुम्हाला न्याय मिळेल का याचा विचार करा आणि आपल्या हक्काच्या ॲड. अनिकेतराजे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पॅनलला बहुमताने निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आ. निलेश राणे यांनी यावेळी केले.
प्रारंभी संजीवराजे नाईक निंबाळकर त्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात निवडणूक प्रचाराचा आढावा घेत आमचे पॅनल निश्चित विजयी होणार असल्याची ग्वाही देतानाच, सन १९९६ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेत निवडून गेलेल्या आ. रामराजे यांनी आपल्या सहकारी अपक्ष आमदारांचा पाठिंबा देऊन शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेवर आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी मंत्री पदा पेक्षा आम्ही सर्व अपक्ष दुष्काळी पट्ट्यातून निवडून आलो असून आम्हाला शेतीच्या पाण्याची आवश्यकता आहे ते प्राधान्याने उपलब्ध करून द्या अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फलटणमध्ये येऊन शेतकरी मेळाव्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करून आ. श्रीमंत रामराजे यांना या महामंडळाचे उपाध्यक्ष पद देऊन रखडलेले पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या वाट्याचे पाणी मुदतीत अडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. आ. रामराजे यांनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निधीची उपलब्धता नसताना प्रकल्प पूर्ण करून मुदतीत पाणी अडवून त्याचा वापर सुरू करण्याची आयोगाची अट पूर्ण केली त्या वेळेपासून आमचा शिवसेनेचा संबंध आहे. आज तो नव्याने पुनर्जीवित झाला एवढेच. आम्ही लोकांपासून दूर न जाता सातत्याने विकास प्रक्रियेत कार्यरत असल्याचे संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
