दादासाहेब चोरमले या संवेदनशील नेतृत्वाचा पराभव अनेकांच्या जिव्हारी ; नेतृत्व संघर्षातून अधिक मजबूत होते

फलटण : फलटण नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब चोरमले यांना धक्कादायक पराभव स्विकारावा लागला. त्यांचा हा पराभव अनेक मतदारांइतकाच सामान्य, कष्टकरी, गरजू घटकालाही जिव्हारी लागलेला आहे. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून, तो जनतेसाठी झटणाऱ्या एका संवेदनशील नेतृत्वाचा पराभव असल्याच्या प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहेत.
त्यांच्या मतदारांनाच नव्हे, तर राजकारणापलीकडे पाहणाऱ्या सर्वसामान्य घटकांनाही हा निकाल जिव्हारी लागलेला आहे. “पराभव हा तात्पुरता असतो, पण जनतेच्या मनातील स्थान कायमचे असते.” अनेक नागरिक, समर्थक आणि मतदारांनी पराभवाने न खचता नव्या उमेदीने, नव्या जोमाने पुन्हा कामाला लागण्याचे आवाहन करत “तुमची लढाई आमची आहे, आमचे पाठबळ तुमच्या पाठीशी आहे,” अशा शब्दात अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया विविध माध्यमांद्वारे व्यक्त करून दादासाहेब चोरमले यांना पाठिंबा दर्शविला आहे. फलटण शहरात तत्कालीन प्रभाग क्र. नऊ मधून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या नगरसेविका सौ. वैशालीताई चोरमले यांच्या विजयात त्याचे पती दादासाहेब चोरमले यांचा सहभाग महत्वपूर्ण होता. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीतच नव्हे तर गेली अनेक वर्षे राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान उत्तमरित्या राहिले आहे. पत्नी सौ. वैशालीताई यांच्या नगरसेवक पदाच्या कालावधीत त्यांच्या प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसून सर्व रस्ते दर्जेदार केले होते. पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, गटर पाईप लाईन, दुहेरी गटर पाईपलाईन त्याचबरोबर समाज मंदिर व ३५ लाखांची अद्यावत जिमची उभारणी करण्यात आली आहे. प्रभागातील सर्व भागांमध्ये गटर पाईपलाईन करून सिमेंट काँक्रीटचे तयार केलेले रस्ते आजही दर्जेदार अवस्थेत आहेत. प्रभागातील अनेक लोकांचे घरांचे कॉम्प्लिशन करून त्यांना न्याय दिला, तसेच जवळपास ५७ लोकांना नगर परिषदेच्या माध्यमातून शासनाची टॉयलेट मिळवून दिली. अनेकांना पंतप्रधान आवास योजनेखाली घरकुले मंजूर करून दिली. माळजाई मंदिर परिसरामध्ये फुटपाथ वर पेविंग ब्लॉक बसविण्यात आले. या मंदिरा समोरील भागामध्ये अनेक ठिकाणी कच्चे रस्ते होते त्याचे रस्त्यांचे डांबरीकरण केले. जलमंदिर परिसरामध्ये गटर पाईपलाईन करून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले. शिवाजी रोड व शनिवार वाडा, वडर वसाहत, धनगर वाडा या परिसरातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीट केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिराचा परिसर सुशेभीकरण केला व संरक्षक भिंत बांधली. आजही त्या ठिकाणी १५ लाख रुपयाचे अंतर्गत सुशिभीकरणाची वर्क ऑर्डर काढून ठेवण्यात आली आहे. त्यांच्या कालावधीत अशी अनेक सुमारे बावीस कोटी रुपयांची विविध दर्जेदार कामे करण्यात आली आहेत. त्यांच्या तत्कालीन प्रभाग क्र. ९ ला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहरातील सर्वोत्कृष्ट प्रभागाचा बहुमान प्राप्त झाला होता. या सर्व कामगिरी मध्ये सौ. वैशालीताई यांच्या बरोबर दादासाहेब चोरमले यांचेही योगदान अतिशय महत्वाचे होते.
कोविड काळातील अडचणीच्या काळात किट वाटप, ड्रायफूट किट वाटपासह प्रभागातील लोकांना फिरत्या दवाखान्याचा लाभ मिळवून दिला. आज महिला वर्गात लाडकी बहीण योजना प्रिय आहे, ही योजना आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त महिलांना मिळावी यासाठी या योजनेचे फॉर्म मोठ्या संख्येने भरून घेण्यात दादासाहेब चोरमले यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिला आहे. नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून असो वा प्रशासकीय राजवटीच्या काळात, काळ, वेळ न पाहता मदतीला धावणारे, प्रसंगी स्वतःच्या खिशातून पदरमोड करून लोकांची कामे करणारे, अभ्यासू विचार, स्पष्ट भूमिका आणि प्रभावी वक्तृत्वाने सदैव जनतेच्या हितासाठी उभे राहिलेले दादासाहेब चोरमले हे केवळ एक नाव नाही, तर जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे असा विश्वास आजही अनेकजण व्यक्त करीत आहेत.
“पराभव हा तात्पुरता असतो पण जनतेच्या मनातील स्थान कायम असते.”
अभ्यासू विचार, स्पष्ट भूमिका, कामाची हातोटी आणि प्रभावी वक्तृत्वाने सदैव जनतेच्या हितासाठी उभे राहिलेले दादासाहेब चोरमले हे केवळ एक नाव नाही, तर जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे. नुकत्याच नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या वाट्याला आलेला पराभव हा केवळ एका निकालापुरता मर्यादित आहे. हा पराभव तुमच्या कामाचा नाही, तुमच्या निष्ठेचा नाही आणि तुमच्यावर जनतेने ठेवलेल्या विश्वासाचा तर मुळीच नाही. हा निकाल अनेक मतदारांइतकाच सामान्य, कष्टकरी, गरजू घटकालाही जिव्हारी लागलेला आहे. कारण लोकांनी त्यांच्यात
आपला माणूस पाहिला होता आणि आजही पाहत आहेत. त्यामुळे दादासाहेब, तुम्ही पराभवाने खचू नका. नव्या उमेदीने, नव्या आशेने, नव्या भरारीसाठी पुन्हा एकदा कामाला लागा. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. कालही, आजही आणि उद्याही. कारण संघर्ष संपत नाही, तो फक्त नवे वळण घेत असतो अशा प्रतिक्रिया मतदार, नागरिक व त्यांच्या मित्र परिवारामधून व्यक्त होत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!